Wednesday 5 December 2012

आनंदानं जगायचं असेल, तर अतिशय निर्भय बना


समस्या, प्रत्येकाच्या जीवनात समस्याच समस्या असतात. काही माणसं समस्यांखाली पार पिचून जातात, गलितगात्र होतात. काही माणसं माझ्या जीवनात समस्याच समस्या आहेत अशी सारखी ओरड करीत असतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये एमिले कोया नावाचा एक मानसोपचार करणारा व्यक्ती होऊन गेला. त्याच्याकडे हजारोंच्या संख्येने लोक येत असत, उपचार घेत असत आणि रोगदुरुस्त होऊन जात असत. खरं म्हणजे ºिश्चन धर्मात 'फेथ हिलिंग' नावाची प्रक्रिया आहे. येशू ºिस्ताच्या नावावर ही प्रक्रिया चालते. रोगदुरुस्तीकरिता मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. भारतात त्याला 'चंगाई सभा' असंही म्हटलं जातं. या फॉर्मासिस्ट असणार्‍या एमिले कोयाने 'फेथ हिलिंग'चं नाव घेतलं असतं तर जगभरात मानसन्मान, पैसा, कीर्ती त्याला प्राप्त झाली असती; पण तो एवढा वैज्ञानिक मनोवृत्तीचा व प्रामाणिक गृहस्थ होता की, आलेल्या प्रत्येक रोग्याला म्हणायचा, ''तुम्ही दुरुस्त झाला आहात हे तुमच्या मनाचं सामर्थ्य आहे. मी फक्त तुम्हाला ते वापरायला शिकवलं आहे, प्रवृत्त केलं आहे.''

असंच एकदा त्याच्याकडे आलेल्या पेशंट बाईने तिच्या समस्या सांगायला सुरुवात केली. त्याने तिचं म्हणणं समजून घेतलं आणि तिला म्हणाला,''बाई, तुम्ही काय करता की तुमच्या जीवनात निर्माण झालेली एखादी छोटीशी जरी समस्या असेल तरी तुम्ही सारखा तिचाच विचार करता. विचार करून करून मुळात उंदराएवढी असलेली समस्या डोंगराएवढी करून ठेवता आणि मग त्या डोंगराएवढय़ा समस्येच्या ओझ्याखाली पार पिचून जाता. समस्या केवळ विचार करून करून कधीच सुटत नसतात. या जगात समस्या सोडविण्याचे दोनच मार्ग आहेत. एक जी समस्या तुमच्या जीवनात निर्माण झाली असेल तिचा एकदाच विचार करा. ती सोडविण्यासंबंधीच्या मार्गाचा विचार करा. निर्णय घ्या! आणि तडकाफडकी समस्या सोडवून मोकळे व्हा! योग्य, अचूक मार्गाचा वापर करा आणि त्या समस्येपासून मुक्त व्हा!

समजा ती समस्या तुम्हाला सोडवणं शक्यच नसेल. तुमच्या अधिकारक्षेत्राच्या, क्षमतेच्या, ताकदीच्या बाहेरची असेल तर ती समस्या आपल्या जीवनात नाहीच आहे, असं गृहीत धरून जगायला शिका. समस्या सोडविण्याचा हा दुसरा मार्ग आहे.''

एमिले कोयाने समस्या सोडविण्याचे हे दोन मार्ग सांगितले आहेत. तेवढेच हे दोन मार्ग या जगात आहेत. आपण सर्वसामान्य माणूस काय करतो की, समस्या सोडविण्याविषयीचा निर्णय घ्यायला घाबरतो. अनिर्णीत अवस्थेत राहिल्यामुळे प्रचंड नुकसान होतं. अनेकदा असं आपल्याला वाटतं,''मी निर्णय घेतला आणि तो चुकला तर?'' कदाचित काही काळ वाट पाहिल्यानंतर समस्या आपोआप सुटेल अथवा अधिक अचूक निर्णय घेण्याची संधी मिळेल; पण असं दरवेळी घडणं शक्य नसतं. आपला हॅम्लेट झाला असेल, द्विधा मन:स्थिती झाली असेल, तर कागदपेनाचा वापर करावा, या समस्येबाबत 'अ' निर्णय घेतला तर काय फायदे होतील, काय तोटे होतील हे लिहून काढावे. हा विचार करीत असताना मी 'अ'च निर्णय घेणार आहे, असं गृहीत धरून सखोल, सांगोपांग विचार करावा व फायदे-तोटे तपशीलवार लिहून काढावेत. थोडय़ा वेळानंतर 'ब' निर्णय घेतला तर काय फायदे-तोटे होतील हेही तपशीलवार लिहून काढावे. कदाचित या समस्येत तिसराही निर्णय घेणे शक्य असेल तर तिसरा 'क' निर्णय घेतल्यावर काय फायदे-तोटे होतील तेही विस्तारानं कागदावर नोंदवावं. ही कसरत करताना आपल्याच विचारांना दिशा मिळते. मनाचा गुंता, विचारांचा गुंता सोडवायला मदत होते. वाटल्यास तेव्हाच वा एखाद्या दिवसानंतर पुन्हा 'अ', 'ब' व 'क' नीट वाचावं आणि सर्वात जास्त योग्य वाटेल (त्या वेळी) तो निर्णय घेऊन मोकळं व्हावं. हा निर्णय घेण्याचा उत्तम व जास्तीतजास्त अचूक ठरू शकणारा मार्ग आहे. केवळ समस्येकरिताच नव्हे, तर कोणताही निर्णय घेण्याबाबत साशंक असाल त्या वेळी हा मार्ग वापरता येईल.

काही समस्या आपल्याला सोडविता येत नसतात. ही जीवनातील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी हे सत्य स्वीकारून ही समस्या अशीच राहणार आहे असं गृहीत धरून जगावं लागतं. जगायला शिकावं लागतं. आपल्या आजूबाजूला कसंही वातावरण असलं तरी त्याचा मनावर परिणाम न होऊ देण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. हे आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिलेलं आहे. यालाच ती समस्या अस्तित्वातच नाही, असं गृहीत धरून जगायला शिकणं म्हणतात.

आपल्या जीवनात आनंदानं जगायचं असेल आणि दुसर्‍यालाही आनंदानं जगू द्यायचं असेल तर काही दृष्टिकोन स्वीकारावे लागतात.

एक विधायक विचार करा! आणि विधायकच वागा! आपण नाटक पाहतो, सिनेमा पाहतो, कादंबर्‍या वाचतो. या सगळय़ांमधून 'टिट फॉर टॅट'. 'कोणी आरे म्हटलं तर त्याला कारे म्हणायचं,' असं शिकवलं जातं. त्यामुळे बदला, प्रतिशोध, दुश्मनी निभावणं यात सर्वसामान्य माणून अडकून पडतो. आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याविषयी वाईटसाईट बोलतात, टीका करतात, चिखल फेकण्याचा प्रयत्न करतात. हे ऐकलं की आपण पिसाळतो, आपण त्यांच्याबद्दल वाईटसाईट बोलतो. उत्तरं देण्याच्या प्रयत्नात चिखलफेक करतो. आपली सगळी निर्मितीक्षमता, ऊर्जा असल्या निर्थक गोष्टींत खर्च करतो. परिणामत: आपल्या आजूबाजूच्या खुज्या माणसांप्रमाणे आपणही खुजे बनत जातो आणि मग 'अवघे खुजे धरू सुपंथ' या पद्धतीने जगत जातो. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपली एनर्जी असल्या क्षुल्लक गोष्टीत खर्च न करता सगळी निर्मितीक्षमता आणि ऊर्जा चांगल्या कामात खर्च करावी. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढविण्यात खर्च करावी. स्वत: एवढं वाढत जावं की, बोलणार्‍याची टीका आपल्या कानापर्यंत पोहोचूच नये. कुणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याची थुंकी आपल्यापर्यंत पोहोचूच नये. हा खरा विधायक मार्ग आहे. मानवी जीवनात खूप विधायक पद्धतीने वागता येतं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो.

एक ऋषी महोदय सकाळच्या वेळी सूर्याला अघ्र्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभे होते. ते ओंजळीत पाणी घेऊ लागले. त्यांच्या हातात पाण्यासोबत एक विंचू आला, चावला. विंचवाला सोडायचं म्हणून त्यांनी ओंजळीतील पाण्यासोबत विंचवाला सोडून दिलं. पुन्हा ओंजळीत पाणी घेऊ लागले. पुन्हा विंचू ओंजळीत आला. फरक जाणवला. हे वारंवार घडायला लागलं. त्यांच्या बाजूला उभा असलेला त्यांचा शिष्य म्हणाला,''गुरू महोदय, हे तुम्ही काय करता आहात? (एकदा तुम्ही त्या विंचवाला जीवदान दिलं हे मी समजू शकतो; पण तो वारंवार तुमच्या ओंजळीत येतो. वारंवार चावतो तेव्हा एकदाचं ह्या विंचवाला ठेचून मारा आणि सूर्याला अघ्र्य अर्पण करण्याचं पवित्र कार्य निर्विघ्नपणे पार पाडा.'' यावर गुरू महोदय मिस्कीलपणे उद्गारले, ''मित्रा, त्याचं असं आहे की, चावणं हा कदाचित त्या विंचवाचा धर्म असेल. (संस्कृत भाषेत 'धर्म' या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वभाव'सुद्धा होतो.) प्राणिमात्रांवर दया करणं हा माझा धर्म आहे. तो त्याचा धर्म पाळतो आहे, मी माझा धर्म पाळतो आहे.'' एवढय़ा एक्सटेंटपर्यंत, या मर्यादेपर्यंत तरी माणसाला विधायक वागता येतं आणि आपण तसं वागायला हवं. किमान जोपर्यंत कुणी आपल्या जीवावरच हल्ला करीत नाही, अस्तित्वच खुंटवून टाकत नाही तोपर्यंत तरी आपल्याला विधायक विचार करता येतो आणि विधायक वागता येतं.

खूप माणसं आयुष्यात जगताना भीतभीत जगत असतात. कोण काय म्हणेल? लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? अशा प्रश्नांच्या दडपणापोटी मनापासून जे करायचं असतं तेही करीत नाही. अनेक प्रकारांची भीती बाळगतात. उद्या काय होईल? भविष्यात काय घडेल? या काल्पनिक ओझ्याखाली दडपून जातात. भूतकाळामधल्या नकारात्मक गोष्टी आठवून आठवून स्वत:चं नुकसान करून घेतात. भूतकाळातील सावली सतत त्यांचा पिच्छा पुरवीत असते.

जीवनात खरंच जगायचं असेल, आनंदानं जगायचं असेल तर सगळय़ा प्रकारची भीती मनातून काढून टाका. अतिशय निर्भय बना, जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक क्षण आणि क्षण समरसून जगा. समरसतेनं, एकाग्रतेनं जगलेला प्रत्येक क्षण आपल्याला आनंद देऊन जातो. खेळण्याच्या मैदानावर आपण दोन तास समरसून खेळतो. प्रचंड थकतो. अक्षरश: घामानं निथळतो. तरी त्या क्षणी आपल्या मनाला खूप आनंद होतो. कारण ते खेळण्याचे दोन तास आपण एकाग्रतेनं समरसून घालविलेले असतात. कितीही कष्टाचं काम असेल, मेहनतीचं, वेदनादायक काम असेल आणि ते आपण मनापासून एकाग्रतेनं करणार असू, तर त्या कामातून आपल्याला आनंदच प्राप्त होतो.

जर आपण आपल्या जीवनात प्रत्येक काम मनापासून करू लागलो, समरसून करू लागलो तर आपलं सारं जीवनच आनंदमय बनून जाईल. त्यामुळे जीवनात जे काही करायचं आहे ते मनापासून, समरसून, एकाग्रतेनं करा! वर्तमानकाळातला प्रत्येक क्षण जगताना त्यावर भूतकाळाची सावली पडू देऊ नका आणि भविष्यकाळातील काल्पनिक ओझंही पडू देऊ नका.

जीवनात जेव्हा एखाद्या गोष्टीला मनापासून 'हो' म्हणावसं वाटत असेल, तर आतून झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'हो'च म्हणावसं वाटत असेल तर 'हो'च म्हणा! कारण एकदा आलेली संधी पुन्हा येतेच असं नाही.

ज्यावेळी मनापासून, आतून सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'नाही'च म्हणावसं वाटत असेल तेव्हाही ठामपणे 'नाही'च म्हणा! फक्त समोरच्या व्यक्तीला नीट समजावून सांगून, नम्रपणे 'नाही' म्हणा! सर्वसामान्य माणूस दडपणाखाली वा प्रेमाच्या शोषणाला बळी पडून (आई म्हणते म्हणून, नवरा म्हणतो म्हणून, मुलं म्हणतात म्हणून दबावाला बळी पडतो.)'हो' म्हणतो. परिणामत: आपण सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागत नाही. आपल्या मनाचं ऐकत नाही. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास होतो आणि ज्या व्यक्तीला दडपणाखाली 'हो' म्हटलेलं असतं त्या व्यक्तीच्या कामालाही योग्य न्याय देऊ शकत नाही. दुहेरी नुकसान होतं. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावेत. ''माझी सद्सद्विवेकबुद्धी चुकली तर? या भीतीला हद्दपार करा! आपली सद्सद्विवेकबुद्धी केव्हा मॅच्युअर होणार? त्याला वयाची लिमिट काय असू शकते? याचं काहीही गणित असू शकत नाही. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवा! तिच्यावर विसंबून राहा! आयुष्यात जेव्हा 'हो' म्हणायचं असेल तेव्हा 'हो' म्हणा! 'नाही' म्हणायचं असेल तेव्हा 'नाही'च म्हणा! चूक होईल याची भीती बाळगू नका! मानवी जीवनात कितीही प्रयत्न केला तरी चुका होतातच. झालेली चूक स्वीकारा. चूक दुरुस्त करण्याची यंत्रणा स्वत:त निर्माण करा. चुकांपासून शिकत जा! आणि सातत्यानं यशाच्या दिशेनं वाटचाल करीत जा. आनंदानं जगत जगत कितीही कष्ट पडले तरी हसतमुखानं वाटचाल करीत जात हे मानवी जीवनाच्या सुखाचं, यशाचं रहस्य आहे, मर्म आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

2 comments:

  1. IT IS ABSOLUTELY TRUE THAT-
    आपल्या जीवनात प्रत्येक काम मनापासून करू लागलो, समरसून करू लागलो तर आपलं सारं जीवनच आनंदमय बनून जाईल. त्यामुळे जीवनात जे काही करायचं आहे ते मनापासून, समरसून, एकाग्रतेनं करा! वर्तमानकाळातला प्रत्येक क्षण जगताना त्यावर भूतकाळाची सावली पडू देऊ नका आणि भविष्यकाळातील काल्पनिक ओझंही पडू देऊ नका

    ReplyDelete
  2. लेख वाचून प्रेरणा मिळाली. आपले कार्य आणि भूमिका मनात जाऊन भिडणारी होती.
    कधी कोणता क्षण काय देयल सांगता येत नाही, अपयशाच्या वाटेवरून जाताना क्षणा-क्षणा शी
    भिडताना एखादा प्रेरणा देणारा क्षण कधी मिळतो सांगता येत नाही. अशीच हि अशावाधाची
    झुळूक मला मिळाली,
    सर, आपला आशावाद आणि क्षणाला देता येणारा प्रतीसात जीवनातील वास्ताव सांगून गेला.
    कालच्या आणि उधाच्या भानगडीत न पडता आजचा क्षण कसा जगवा किंबहुना
    क्षणाला कंस भिडाव इतकाच उमेद मला मिळाला.
    THANKU SIR.
    G. l. bhonde
    from amravati
    9405066940

    ReplyDelete