Saturday 28 July 2012

प्रबोधनकारांचे विचार रावते विसरलेत का?


हे जादूटोणाविरोधी बिल.. आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहे. उद्या आम्ही आमच्या घरी भक्तिभावानं, श्रद्धेपोटी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल तुमचं आर्थिक नुकसान झालं आणि आम्हाला सहा महिने जेलमध्ये पाठवाल. आमचे वारकरी श्रद्धेनं पंढरपूरला पायी जातात. तुम्ही म्हणाल तुमचं शारीरिक नुकसान झालं आणि वारकर्‍यांना जेलमध्ये पाठवाल. सहा महिने ते सात वर्षे. आम्ही भक्तिभावानं दोन तास पूजा केली तर तुम्ही म्हणाल आमचं मानसिक नुकसान झालं आणि तुम्ही आम्हाला जेलमध्ये पाठवाल..!''

एवढय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार गुरुनाथ कुळकर्णी (ते वकीलही होते) उभे राहिलेत. म्हणू लागले, ''अहो रावते, असं या जादूटोणा बिलात काहीही नाही. कुठे आहे ते दाखवा. तुम्ही कुणाच्या आधारावर हे बोलता?''

''तुम्ही गप्प बसा! मला थांबवू शकत नाही. बिलावर आमदाराला बोलता येतं. कितीही बोलता येतं. हा माझा अधिकार आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. माझं म्हणणं खोडा, पण आता मी बोलणारचं.. असं म्हणत आ. दिवाकर रावते बोलत राहिले. आ. गुरुनाथ कुळकर्णी आणि इतरांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आ. दिवाकर रावते बोलत राहिले, हे बिल हिंदू धर्मविरोधी आहे असं सांगत राहिले. त्या दिवशी विधानपरिषदेतील त्यांचं हे भाषण अपूर्ण राहिलं. 2006 सालची ही गोष्ट. मुंबईचं अधिवेशन संपलं. अजूनही विधानपरिषदेत आ. दिवाकर रावते हे ऑनलेग आहेत. म्हणजे बिलावर पुन्हा दुसर्‍या अधिवेशनात चर्चा सुरू झाली तर आ. दिवाकर रावतेंच्या बोलण्यापासून त्याची सुरुवात होणार! आ. रावतेंच्या भाषणांच्या बातम्या मोठय़ा प्रमाणावर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या.'जादूटोणाविरोधी बिल' हा खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळं महाराष्ट्रभर बातम्या वृत्तपत्र माध्यमातून पसरल्या. पण असं बिलात काहीही नाही. हे मुद्दाम चुकीचं मत मांडलं आहे असं मात्र कुणाही वर्तमानपत्रानं सोबत लिहिलं नाही. याविरुद्ध मत मांडणारं दुसर्‍या कुणाचं भाषणच झालं नसल्यामुळं वृत्तपत्रातून तशी बातमी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही.सनातन्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवून दाखवून वारकर्‍यांना, धार्मिक लोकांना भडकवलं. हे खोटंनाटं सांगून लोकांना भडकवणं आजही सुरू आहे. सनातन्यांचं मी समजू शकतो. कारण गोबेल्सप्रणीत अफवा पसरविण्याच्या यंत्रणेमध्ये ते तरबेज आहेत. त्यांच्या गुरूंनी त्यांना त्या पद्धतीनं 'ब्रेनवॉश' करूनच जनतेत सोडलं आहे. याची महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याला व त्यातील 'एटीएस'(अँन्टी टेररिस्ट स्कॉड) ला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं सनातन संस्था आणि तिचे मुखवटे असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पण या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा प्रखर डोस पाजणार्‍या प्रबोधनकार ( म्हणूनच त्यांना 'प्रबोधनकार' ही पदवी लोकांनी बहाल केली.) ठाकरेंचा वारसा असणार्‍या शिवसेनेच्या (मा. बाळासाहेब ठाकरेंचे ते वडील आहेत) आ. रावतेंनी असा खोटा, चुकीचा, समाजविघातक प्रचार का केला?आ. दिवाकर रावते हे उत्तम संसदपटू आहेत. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विधानपरिषदेत अत्यंत लढाऊ पद्धतीनं, लोकांचे प्रश्न जिव्हाळय़ानं लावून धरताना, लोकांसाठी लढताना मी आणि महाराष्ट्रानं पाहिलं आहे.म्हणूनच जेव्हा सामाजिक न्यायमंर्त्यांनी विरोधी पक्षाच्या सहमतीनं हे बिल आणूया, त्यांच्याही सूचनांचा विचार करूया, असं ठरवलं. माझ्यावर काही जबाबदारी सोपवली. तेव्हा 2005 साली सगळय़ात पहिले मी आ. दिवाकर रावते यांना भेटलो. त्यांच्यासोबत छान चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयासंबंधी बोलताना ते म्हणाले, ''अहो मानव, तुम्ही आता हे काम करता आहात, पण मी आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंसोबत या परिवर्तनाच्या लढाईत सामील आहे. शिवसेनेच्या जन्माआधीपासून माझ्यावर हा संस्कार (प्रबोधनकार ठाकरेंचा) झाला आहे. आमच्यासाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन' काही नवं नाही.'' त्यानंतर विस्तारानं त्यांच्यासोबत चर्चा झाली. मूळ बिलात बदलासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अतिशय अनुकूल प्रतिसाद दिला. त्यानंतर आ. सुभाष देसाईंशी चर्चा केली. त्यांनीही पहिल्या भेटीत अत्यंत मोलाच्या सूचना केल्या. एवढंच नव्हे, तर. डिसेंबर 2005 मधील अधिवेशनात हे बिल मांडण्याचं ठरलं. कॅबिनेटची सही झाली. बिल छपाईला जाण्याआधी मी आ. सुभाष देसाईंना दाखवलं. त्यांनी सुचवलं.''मानव,'दैवीशक्ती','देवी', 'देव' असे शब्द बिलात ठेवू नका. त्याऐवजी 'अतिंद्रिय शक्ती', 'अतिमानुष शक्ती' असे शब्द वापरा.'' केवळ सुचवलंच नाही तर माझ्यासोबत बसून ते शब्द जिथे-जिथे आहेत तिथे-तिथे आम्ही एकूण दहा बदल केले. त्यानंतर तडक मी कायदा विभागाचे सचिव श्री. शिंदेकरांकडे गेलो. त्यांना आ. सुभाष देसाईंनी सुचवलेले बदल सांगितले. त्यामुळं बिलात फरक पडत नाही. हे त्यांना पटल्यावर त्यांनी हे बिल रात्री 10 वाजता छपाईला पाठवलं. मुख्यमंर्त्यांशी फोनवर ते बोलले. आ. देसाईंनी सुचविलेल्या बदलासंबंधी सांगितलं. मुख्यमंर्त्यांनी संमती दिली. ना. हांडोरेंना सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कॅबिनेटची सही झाल्यावरसुद्धा 10 ठिकाणी बदल करण्यात आले. पंधरा दिवस आधी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्या वतीनं बिलासंबंधी बोलण्यास मी मातोश्रीवर गेलो होतो. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर वेगळंच वातावरण होतं. राज ठाकरे नाराज होऊन बाहेर पडणार अशी बातमी होती. बाळासाहेब ठाकरे फार वेगळ्या मूडमध्ये होते. शिवसेना नेत्यांची, आमदार, खासदारांची सारी धावपळ सुरू होती. त्यामुळं बाळासाहेब भेटू शकले नाहीत; पण त्याही वातावरणात उद्धव ठाकरे अर्धातास बोलले. '' हे काम आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. बिलाच्या मथळ्यात 'अंधविश्वास' हा शब्द होता. ते पाहून ते म्हणाले, 'अंधविश्वास' हा शब्द कशाला ठेवता? मग श्रद्धा, अंधश्रद्धा ही भानगड येते. त्यापेक्षा 'अघोरी प्रथा' हा शब्द वापरा. उद्धव ठाकरेंशी त्या दिवशी नीट बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर सोमवारी भेटायचं ठरलं, पण सोमवारी उद्धवजींचा फोन बंद होता. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला होता. शिवसेनेमधलं कुणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं आणि मला नागपूर अधिवेशनात पोहोचायचं असल्यानं थांबणं शक्य नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना उद्धव ठाकरेंची सूचना सांगितली. मुख्यमंर्त्यांनी आनंदानं संमती दिली. ''ठीक आहे, बिलाच्या मथळ्यातून 'अंधविश्वास' शब्द काढून टाका. त्याऐवजी 'अघोरी प्रथा' शब्द टाका.'' आणि मग बिलाचं नाव झालं, 'महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन.' हा सारा इतिहास मी का सांगतो आहे? कारण सगळ्यांच्या सहमतीनं हे बिल संमत व्हावं असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारनं हे बिल आणलं. भाजप पक्षानं 100 टक्के संमती दिली. शिवसेनेनं 100 टक्के संमती देण्याआधीच हे बिल सभागृहात मांडून 16 डिसेंबर 2005 साली विधानसभेत संमत झालं. पण तोवर शिवसेनेनं सुचविलेल्या अनेक सूचना या बिलात अंतर्भूत झाल्या आहेत. असं असताना आ. दिवाकर रावतेंनी या बिलाच्या विरोधात सनातन्यांची सुपारी का घेतली? ते सनातन्यांची भाषा का बोलतात? प्रबोधनकार ठाकरेंची भाषा ते विसरले आहेत काय? ते जे आज या बिलासंबंधी खोटंनाटं (होय, जाणीवपूर्वक हा शब्द मी वापरतो आहे) बोलताहेत ते पाहून प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्म्याला (प्रा. रावते मानतात म्हणून) वेदना होत नसतील का? मला माहीत आहे, आ. दिवाकर रावतेंना बिल चांगलं कळतं. हा त्यांचा गैरसमज नाही. ते मुद्दाम खोटं बोलून बिलासंबंधी अपप्रचार करताहेत. त्यांनी खरं बोलून या बिलाला विरोध करावा, असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी म्हणावं, परिशिष्टातील 12 कलमांना माझा विरोध आहे. भूत काढण्याच्या नावाखाली छळ होऊन माणसं मेली तरी चालतील, चमत्कारी बाबांनी लोकांना ठगवलं तरी चालेल, जादूटोण्याच्या संशयापायी छळ होऊन माणसं मेली तरी चालतील..वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुबुद्ध जनतेला माझं जाहीर आवाहन आहे की, या बिलाला विरोध करणार्‍या सगळ्यांनाच आपण जाहीर धारेवर धरा. आडवेतिडवे प्रश्न विचारा, जाब विचारा, तुमच्याजवळ या बिलाची प्रत नसेल तर ती मी ु.रलरपी.ेीस.ळप(ही अ.भा.अंनिसची साईट आहे) या साईटवर टाकली आहे. तिथून प्रिंट करून ही प्रत मिळवा आणि सनातन्यांचं कारस्थान उधळून लावा. त्यांना या देशात पुन्हा चातुर्वर्ण आणायचा आहे. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उतरंड निर्माण करायची आहे. सार्‍या प्रकारच्या अंधश्रद्धा पुन्हा समाजात रुजवायच्या आहेत. पुन्हा मनुस्मृतीचे कायदे या समाजावर लादायचे आहेत. अस्पृश्यतेचं समर्थन करणारीही मंडळी आहे हे लक्षात ठेवा. खोटं वाटत असेल तर 'सनातन प्रभात' वाचा, वर्षभराचे अंक चाळा. म्हणजे याचं खरं स्वरूप तुम्हाला दिसेल. म्हणूनच वारकर्‍यांचं आवरण ओढलेले छुपे सनातनी म्हणतात, ''आम्ही आधी हिंदू आहोत, नंतर वारकरी आहोत. मनुस्मृती चांगली आहे. म. फुले-सावित्रीबाई

फुले यांनी काहीच केलं नाही. या देशात स्त्रियांना स्वातंर्त्य, शिक्षण होतंच. सगळं वाईट

मुसलमानांमुळं झालं आहे. आधुनिक भारतातल्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण हे चालू द्यायचं का? आजच्या पिढीनं हे ठरवायचं आहे. जादूटोणाविरोधी बिल हे केवळ निमित्त.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment