Tuesday 26 February 2013

ज्योतिष्यांनो, या १४ प्रश्नांची उत्तरे द्या!

     A A << Back to Headlines     
ज्योतिष किती खरे? किती खोटे? फलज्योतिष विज्ञान आहे काय? या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव आणि ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आज खामगावात आमनेसामने भिडणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी खामगावातील नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता हे आयोजन केले आहे. गेल्या २५ वर्षांत ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते सिद्ध करा आणि १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवा, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्यासाठी कुठलाही ज्योतिषी वा ज्योतिषी महामंडळाचा पदाधिकारी पुढे आला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर नंदकिशोर जकातदारांनी ज्योतिष हे विज्ञान आहे? या विषयावर बोलण्याची तयारी दाखविली, हे महत्त्वाचे आहे. अंनिसच्या वतीने जगभरातील ज्योतिष्यांना सोबतच्या लेखातील १४ प्रश्न नेहमी विचारले जातात. आजपर्यंत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कोणीही देऊ शकले नाहीत. बघूया आज काय होते ते.- संपादक१) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? २) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? ३) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? ४) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्‍वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशना'चे काय मत आहे? ५) आजचे फलज्योतिषी ९ (किंवा १२) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणा?र्‍या कुंडल्या किती विश्‍वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणा?र्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो? ६) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? ७) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही

सरकारला करावी काय? ८) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? ९) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणा?र्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळय़ा वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? १0) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्‍चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षांनंतर तो निश्‍चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्‍चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? ११) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गभर्पात करतो व जन्माला येणा?र्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? १२) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, १९३0 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ १८ वर्षे होते. आता ते ६८ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाट्याला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रय▪करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळय़ांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळय़ाच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? १३) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? १४) दोनदा २0-२0 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे ९0 टक्क्यांपेक्षा अधिक ९५ टक्के अचूक निघायला हवीत, तर १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या ९0 टक्के ख?र्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते ९0 टक्के अचूक निघावीत. १५ लाख मिळतील; पण ७0 टक्के जरी खरी निघाली (दोनदा २0-२0) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - ९३७१0१४८३२

२ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल
     

     << Back to Headlines     

माणूस प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं?


मागचा प्रेमावरचा लेख प्रसिद्ध झाला आणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना दिली अभिनंदन'! 'प्रेमाला प्रतिष्ठा दिली त्याबद्दल धन्यवाद'! असे खूप फोन होते. पण 'तुम्ही लिहिलं त्यात शेवटपर्यंत प्रेम म्हणजे काय ते कळलयच नाही'. 'विषयवासना, सेक्स म्हणजे प्रेम असं तुम्हांला म्हणायचं आहे का?' 'तुमच्यासारख्या विचारी माणसानं 'अशा' विषयावर का लिहावं? अशाही प्रतिक्रिया होत्या, तर काही फोन फारच विचित्र होते. माझ्या एका ओळखीच्या मुलीचं प्रेम जुळलं. त्या दोघांचं प्रेम मला तोडायचं आहे. ती त्याच्यासोबत कधीच सुखी होणार नाही. कसं तोडू हे प्रेम? कसं वाचवू तिला? तर प्रेम कसं करायचं? समोरच्या व्यक्तीला प्रेमात कसं पाडायचं? असे प्रश्न विचारणारेही काही फोन होते.

'प्रेम' हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा, फार महत्त्वाचा, आदराचा, अभ्यास करण्याचा, समजून घेण्याचा विषय आहे. भाऊ, प्रेम म्हणजे नेमकं काय? हे सांगणं फार कठीण आहे. मी आधीच सांगितलं व्यक्तिपरत्वे प्रेमाची व्याख्या बदलते. बदलू शकते. व्यक्तीनुसार प्रेमाची तीव्रता, प्रेमभावनेची पातळी बदलते. तरी सर्व माणसांनी सर्वाच्या हृदयाला जाणवणारी, स्पर्शधारी ही भावना आहे. सर्वाना जाणवते, स्पर्शते, उसासो सोडायला लावते हाच या भावनेतला 'समान दुआ', 'समान धागा' आहे.

आयुष्यात कधीच प्रेमात पडली नसेल अशी व्यक्ती अपवादच असली पाहिजे. माणूस प्रेमात कां पडतो? प्रेमात कसा पडतो? सामान्यत: एखादी विरुद्ध लिंगीय व्यक्ती आवडते. खूप खूप आवडते. फारच आवडते. तिच्याविषयी जबरदस्त ओढ वाटते. आकर्षण वाटतं. तिच्या सहवासात राहावसं वाटतं. तिला पाहत राहावसं वाटतं. तिच्यासोबत बोलत राहावसं वाटतं. समोर नसताना सारखी ती व्यक्ती आठवत राहते.

तिच्या आठवणीत रमताना खूप छान वाटतं. ती अचानक समोर दिसली तर छातीत धडधड होते. पण ही 'धडधड' खूप छान, हवीहवीशी वाटते. ती हसली की, सारं आसमंत फुलल्यासारखं वाटतं. ती 'रडवेली' झाली, दु:खी झाली की, आसमंतात मळभ दाटून आल्यासारखं वाटतं. सारं विचारांचं, भावनांचं केंद्र ती व्यक्ती बनून बसते. असं काहीसं घडू लागलं की, माणूस प्रेमात पडला असं फार तर म्हणता येईल.

दोन माणसं कोणत्या तरी निमित्तानं वा रस्त्यानं जाताना अचानक समोर येतात. सहज नजरानजर होते आणि एक घडलेला किस्सा. कॉलेज लायब्ररीतून 'तो' बाहेर पडला. वर्गात जाण्यासाठी तेवढय़ात जोरदार पावसाची सर आली. लायब्ररीसमोरून क्लासमध्ये जाणारी 'ती' पावसापासून वाचण्यासाठी लायब्ररीच्या व्हरांडय़ाच्या आडोशाला आली. काहीशी भिजलेली. केसांवर पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकू लागलेले. सलवार कमीजचं कमीज अंगाला चिपकू लागलेलं. आपल्या वक्षस्थळाचं संरक्षण करण्यासाठी वह्या-पुस्तकांचा गठ्ठा तिनं छातीसमोर ढालीसारखा धरलेला. पण.. पावसाचा जोर वाढला. शिंतोडे अंगावर येऊ लागले. आत सरकण्यास जागा नाही. सारा व्हरांडा गर्दीनं ओसंडून वाहतोय. मुलांमध्ये शिरण्याची तिची हिंमत नाही. आतील पोलला लागून असलेल्या सुरक्षित जागी उभ्या असलेल्या त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. डोळ्यानंच तो तिला जवळ येण्याची खूण करतो. पण ती कळूनही हिंमत करू शकत नाही. 'एका मुलाजवळ उभं राहायचं?' पुन्हा तो खुणावतो. आता पावसाचे शिंतोडे तिला अधिकच भिजवू लागलेले. नाइलाजानं ती तिथे येऊ लागते. तो अदबीनं सरकतो. तिला सुरक्षित जागेत घुसू देतो आणि तत्काळ तिथून हलून तिच्या भिजवणीच्या जागेवर जाऊन उभा राहतो. तिला खूप हायसं वाटतं. तो जवळ चिकटून उभं राहण्याचा चान्स त्यानं घेतला नाही म्हणून. पण त्याला थँक्स म्हणायला हवं. पण म्हणायचं कसं? त्याचं लक्षच नाही. शेवटी त्याचं लक्ष जातं. ती डोळ्यांनीच थँक्स म्हणून जाते. अन् त्यानं पहिल्यांदा तिचे ते टप्पोरे, शिलेदार, समुद्राच्या अथांग पाण्यासारखे पाणीदार डोळे पाहिले. इतके सुंदर डोळे? अन् तो त्या डोळ्यांतच अडकून जातो. एकसारखा एकटक पाहत राहतो. तिच्या डोळ्यांत डुबू लागतो. अथांग महासागरात खोल खोल उतरू लागतो. एकटक, एकाग्रतेनं पाहत राहतो. भान हरपून मनसोक्त खोल खोल जात राहतो.

काही क्षण तीही भान हरपून, एकटक, एकाग्रतेनं पाहते. साध्याच दिसणार्‍या या तरुणाच्या भावपूर्ण, जितकं स्वच्छ डोळ्यांमध्ये आपण केव्हा अडकून पडलो हे तिच्या लक्षातच येत नाही. थोडय़ाच वेळात भानावर येते. नजर खाली घेते. पुन्हा पाहते तर तो भान हरपून पाहतोच आहे. त्याची ब्रह्मनंदी टाळी लागली आहे. पापणीही न हलवता तो सारखा पाहतोच आहे. तिला काय करावं ते कळतंच नाही. असा अनुभव तिनं कधी घेतलाच नाही. त्याच्या नजरेत अडकून जायला होतं. नजर काढता काढता येत नाही. काय आहे असं त्या डोळ्यांत? आतवर, खोलवर काहीतरी शिरतं सारं. हृदय आतून असं घुसळू लागतं. कसं कसं, पण छान छान वाटतं. बराच वेळ दोघांचे डोळे सारखे एकदुसर्‍यात गुंतत होते. ती सारखी नजर खाली घ्यायची, पण पुन्हा पाहण्याची अनिवार इच्छा व्हायची. पुन्हा पाहायची. डोळ्यांत अडकायची. तो मात्र एकटक पाहतच होता. अडकूनच पडला होता. किती वेळ उलटला माहीत नाही. पाऊस ओसरला. थांबला. व्हरांडा रिकामा होऊ लागला. नाइलाजानं तीही निघाली. पण त्याची नजर मात्र सारखी तिच्या डोळ्यांचाच वेध घेत होती. झालं तो तिच्या प्रेमात पडला. आकंठ बुडाला. तिच्यावर प्रेमकविता करू लागला. त्याचं सारं विश्व तिच्या अस्तित्वानं, तिच्या डोळ्यांनी व्यापलं. 1970च्या दशकातलं हे प्रेम. याला म्हणायचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट'.'दिसताक्षणीच प्रेमात पडणं'.

हा एक प्रेमाचा प्रकार, प्रेमाचा आविष्कार. माणूस दिसताक्षणीच कसा काय प्रेमात पडू शकतो? समोरची व्यक्ती कोण? कुठली? काय करते? काय योग्यतेची आहे? काहीच माहीत नसताना माणूस असा प्रेमात पडतो हे मात्र खरं आहे. अनेक माणसं प्रत्यक्ष जीवनात या प्रकारे प्रेमात पडली आहेत हेही तेवढंच खरं आहे. अशा प्रेमाची परिणती काय होते? प्रेमाची यशस्विता म्हणजे लगAात रूपांतर होणं असं मानलं तर कदाचित अशा प्रकारच्या प्रेमाचा सक्सेस रेट कमीच असणार आहे. कारण प्रेमात पडताना कुठलीच व्यावहारिक बाजू पाहिलेली नसल्यामुळं दोन पात्रांत जर फारच व्यावहारिक अंत असेल. उदा. जात, धर्म, खानदान, आर्थिक स्थिती, दोन्ही कुटुंबांतील संस्कृती, कर्मठपणा, आधुनिकपणा तर लगAात रूपांतर होणं अशक्यप्रायच होऊन बसतं. म्हणून काय ते प्रेम कमी दर्जाचं असतं? कम अस्सल असतं?

पण तो तिच्या प्रेमात कां पडला? फक्त निळ्या डोळ्यांच्या प्रेमात पडला? मग कोणत्याही निळे डोळे असलेल्या मुलीच्या प्रेमात तो पडेल का? त्याने आधी निळे डोळे कधीच पाहिले नव्हते का? ती खूप सुंदर आहे म्हणून तो प्रेमात पडला कां? त्यापेक्षा अधिक सुंदर मुलगी त्यानं आधी पाहिली नव्हती कां? निळे डोळे असणारी मुलगी काही ही पहिलीच नाही आणि तिच्यापेक्षाही सुंदर मुली त्याच्या आसपास वावरतच होत्या. मग तो तिच्यात प्रेमात कां पडला? आणि नकळत प्रेमात पडला. खूप खूप सिर्मस प्रेमात पडला? का? या प्रश्नाचं उत्तर मी वर्षानुवर्षे शोधतोय. खूप लोकांचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट' समजून घेतलं. मानसशास्त्रीय अंगानं अभ्यास केला. जे उत्तर गवसतं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूस जन्माला आल्यानंतर अगदी बालवयापासून तो माणसांना पारखू लागतो. ओळखू लागतो. काही माणसं त्याला खूप भावतात. काही माणसं खूप आवडतात. त्यांच्याजवळ ही मुलं चटकन जातात. रमतात, आनंदी होतात. कदाचित ही माणसं त्यांच्याशी खूप चांगली वागतात. त्यांना आवडेल अशा पद्धतीनं प्रेम करतात. त्यांना मुळीच वाईट अनुभव न देता फक्त चांगलेच अनुभव देतात, तर काही माणसांजवळ ही लहान मुलं मुळीच जात नाही. जाऊ इच्छित नाही.

साधारणत: मुलं 4-5 वर्षाची व्हायला लागली की, त्यांना स्त्री, पुरुष वेगळे आहेत याची तीव्र जाणीव व्हायला लागते. विरुद्ध लिंगीय व्यक्तीविषयीच्या कुतूहलाचं, उत्सुकतेचं रूपांतर आकर्षणात होण्याच्या सुरुवातीचा हा कालावधी असतो. वय वर्ष 5 ते 10-11 वर्षापर्यंत अशी आवडणारी, भावणारी व्यक्ती जर वारंवार सहवासात आली, प्रेम करू लागली, गालगुच्चे घेऊ लागली, गालांचे चुंबन घेऊ लागली, छातीशी आवळू लागली, आलिंगन देऊ लागली, तर हे मूल त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतं. कदाचित हे मूल 5-6 वर्षाचं असेल. ती विरुद्ध लिंगीय व्यक्ती 10 वर्षे ते 30-35 वर्षाचीही असेल तरी असं घडू शकतं, घडतं. अर्थात त्या मुलाला वा मुलीला आपण प्रेमात पडलो हे फार तीव्रतेनं कळतंच असं नाही. फक्त ती व्यक्ती खूप आवडते. तिचा सहवास खूप आवडतो एवढंच त्यावेळी कळत असतं. जर या दोघांमधले हे प्रेमसंबंध (अत्यंत निकोप, निर्वाज्य. यात कुठेही रूढार्थानं सेक्स नसतो, रोमांस नसतो.) काही काळ चालले तर त्या मुलांच्या मनात खोलवर ते घर करून जातात. प्रेमात पडलेल्या मोठय़ा वयाच्या व्यक्तीची प्रतिमा या मुलांच्या हृदयात बंदिस्त होते.

अनेकदा ही प्रेम व्यक्ती जीवनातून निघून जाते, दूर जाते अथवा तिचं लगA होऊन ती वेगळ्या अर्थानं दुरावते. पण वाढत्या वयासोबत या मुलांच्या मनातील ती प्रेम-प्रतिमा तशीच हृदयात बंदिस्त राहते. वयात आल्यावर मनात खोलवर रुजलेल्या प्रेम-प्रतिमेसारखीच वा त्याच्या आसपासची एखादी व्यक्ती दिसताच आपल्या मनातील खोलवर रुजलेली प्रतिमा हीच आहे असं त्याच्या मनाला नकळत वाटतं आणि माणूस 'लव्ह अँट फर्स्ट साईट' पडू शकतो. खरं म्हणजे तो स्वत:च्या मनात रुजलेल्या प्रेमातच पुन्हा पडत असतो.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

Monday 11 February 2013

प्रेम म्हणजे नक्की काय? खरं प्रेम कशाला म्हणायचं?

प्रेम, ढाई अक्षर प्रेम का. एक अद्भुत अनुभव. एक अवर्णनीय अनुभूती. सार्‍या जगाला वेड लावणारी गोष्ट. सामान्य माणसाकडून अतक्र्य गोष्ट घडवून आणण्याचं कारण. माणसाला जगण्याचा प्रेरणास्नेत ठरणारी तीव्रतर भावना. माणसाला जीवन संपवून टाकण्यास प्रवृत्त करणारी, निराशेचं टोक गाठायला लावणारी असहनीय भावना आणि दुसर्‍याचं जीवनचं संपवून टाकण्यास मजबूर करणारी, अमानुष कृत्याची जन्मदाती विखारी भावना. या सार्‍यांना प्रेमचं म्हणायचं?

प्रियकरानं प्रेयसीच्या बहिणीच्या घरासमोर स्वत:वर सपासप चाकूनं वार करून घेतलेत. खिशात चिठ्ठी सापडली, 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून आत्महत्या करतोय.' काल-परवाची एक बातमी. एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं प्रेयसीचा खून केला. प्रियकरानं प्रेयसीच्या तोंडावर अँसिड फेकले. कॉलेज परिसरात प्रियकरानं प्रेयसीच्या छाताडात सर्वासमक्ष बंदुकीच्या गोळ्य़ा घातल्या. या पद्धतीच्या कितीतरी बातम्या आपण सातत्यानं वाचत, ऐकत आलो आहोत.

निसर्गानंच नर-मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण केलं आहे. जेणेकरून स्त्री-पुरुषांनी एक-दुसर्‍याकडे प्रचंड ओढीनं आकर्षित व्हावं. एक-दुसर्‍यांसोबत प्रणयाराधन करावं. त्यातून अपत्य प्राप्ती व्हावी. माणसाचं मूल खूप परावलंबी असतं. ते स्वत:च्या भरवशावर जगण्यायोग्य बनेपर्यंत मातेनं त्याला सांभाळंलच पाहिजे. नाहीतर ते मरेल. म्हणून निसर्गानंच गर्भवती स्त्रीच्या मनात होणार्‍या बाळाविषयी प्रचंड ओढ निर्माण व्हावी, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या बाळाचं संरक्षण, संगोपन करावं असं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण केलं आहे. निसर्गाच्या या दोन्ही गरजा आहेत. त्यातून दोन प्रकारचं प्रेम. एक वैषयिक प्रेम आणि दुसरं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण झालं आहे.

गुहांमध्ये राहणार्‍या रानटी नर-मादीचं पुढे जाऊन शेती करणार्‍या कुटुंबवत्सल माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं लग्न संस्था निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची गोष्ट' बदलत गेली. नर-मादीनं परस्परांजवळ यावं यासाठी निर्माण झालेलं प्रेम वात्सल्ययुक्त प्रेमाच्या सहवासात उन्नयीत होऊ लागलं. केवळ रतिक्रीडेपर्यंत मर्यादित असणारं नर-मादीमधील प्रेम, बदलून दीर्घकाळ टिकणारं, वात्सल्ययुक्त आणि वैषयिक या दोहोचं मिश्रण असणारं एक नवंच प्रेम उदयास आलं. या नव्या प्रेमाला समाजात, मानवी मनात प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे अधिक सुसंस्कारित प्रेम मानलं जाऊ लागलं.

आणि आजच्या समाजात जन्माला आल्यापासून कथा, कादंबर्‍या, सिनेमा, टी.व्ही. सार्‍या माध्यमातून 'प्रेम एके प्रेम, प्रेम दुने प्रेम' सारखं मनावर आदळत असतं. नैसर्गिक ओढ असतेच. त्यात संस्कारातून सारखं प्रेमाचं प्रोग्रामिंग मनात रुजत असतं. त्यामुळं वयात येताना, आल्यावर जवळपास प्रत्येक तरुण-तरुणी प्रेमात पडते. काही जण अलगदरीत्या नकळत प्रेम जाळ्य़ात अडकतात. आपण प्रेमात केव्हा पडलो हे त्यांना कळतही नाही. काही जणं समजून-सवरून-पाहून समोरचं पात्र आपल्या लायकीचं आहे, नाही याचा विचार करून प्रेमात पडतात आणि काही जण प्रेमात पडल्याचं दाखवतात. मोठय़ा शहरात कॉलेजियन्समध्ये बॉयफ्रेड, गर्लफ्रेड असणं हा स्टेटस् सिम्बॉल झाला आहे. त्यापेक्षा बॉयफ्रेंड नसणं हा फार मोठा 'पराभव' मानला जातो. त्यामुळं किमान दाखविण्यासाठी तरी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असली पाहिजे या अपरिहार्यतेतून प्रेमात असणं गरजेचं झालं आहे.

प्रेमात पडणं जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच प्रेमात आपटणंसुद्धा स्वाभाविक आहे. प्रेमभंग आजही होतात. एकीकडे आजही देवदास निर्माण होतात तर दुसरीकडे कॉलेजच्या 3-4 वर्षाच्या काळात 3-4 प्रेमप्रकरणं होणं, सिरियस अफेअर्स होणं, स्वाभाविक समजलं जाण्याइतपत कॉमन झालंय काही तरुणांच्या जीवनात.

'प्रेम' हा एक शब्द असला तरी त्याची अनुभूती, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. मोठय़ा शहरांनुसार, छोटय़ा गावांनुसारही ती बदलते. वयाच्या 19व्या वर्षापासून मी सामाजिक चळवळीत आहे. 14-15 वर्षे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिकांमधून 'युथ कॉलम चालविले आहेत. युवकांकरता लिखाण केलं आणि गेली 23 वर्षे मुंबईतून व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालविण्याच्या माध्यमात तरुण-तरुणींशी संवाद साधतो आहे. कौन्सिलिंगच्या निमित्तानं त्यांच्या प्रेम समस्या समजून घेतो आहे. पुण्या-मुंबईपासून ते कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरी भागातील युवकांसोबतच छोटय़ा गावातील युवकांनाही समजून घेण्याची संधी माझ्या कार्यशाळांमुळं मला सातत्यानं मिळते. त्यांचं भावविश्व, प्रेमविश्व मी दीर्घकाळापासून समजून घेतो आहे आणि म्हणूनच याही क्षेत्रात आपलं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे असं तीव्रतेनं वाटतं. म्हणूनच या लेखाचा हा प्रपंच. कदाचित कळत-नकळत आणि जाणीवपूर्वकसुद्धा माझ्या आयुष्यात मला सगळ्य़ात जास्त प्रेम, प्रेम समस्या हाताळाव्या लागल्या. प्रेमात पडलेल्या, त्यापेक्षा जास्त प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींना समजावावं लागलं, त्यांचं समुपदेशन करावं लागलं. एक चळवळीचा नेता, वृत्तपत्र-स्तंभलेखक आणि समुपदेशक या तिन्ही नात्यांनी 'प्रेम' या विषयाचा खूप अभ्यास करावा लागला. विचार करावा लागला. शिवाय एक व्यक्ती म्हणूनही या विषयाचा, प्रेमाचा व्यक्तिगत जीवनावर, जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला आहे.

गेल्या चाळीस वर्षात तीन पिढय़ांना मी 'प्रेम' करताना, जगताना पाहतो आहे. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कशाला खरं प्रेम म्हणावं? कोणतं प्रेम उच्च दर्जाचं? कोणतं प्रेम कनिष्ठ दर्जाचं? कुणाचं प्रेम किती जास्त? कुणाचं किती कमी? खरं प्रेम आहे की फक्त इनफॅच्युएशन, 'आकर्षण' आहे. प्लॅटोनिक प्रेम श्रेष्ठ आणि वासनेनं भरलेलं प्रेम खालच्या पातळीचं समजायचं काय? माणूस आयुष्यात एकदाच प्रेम करतो का? जो एकदाच प्रेम करतो ते खरं प्रेम? जो एकापेक्षा अधिकदा प्रेम करतो ते खरं नाही का? का? एकतर्फी प्रेम अर्थहीन का?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधतोय माणसांची मनं. मला छान कळतात असं खूप लोकांना वाटतं. मलाही कधीकधी तसं वाटतं. माझा मानसशास्त्राचा अभ्यासही चांगला आहे. या सगळ्य़ा प्रश्नांची उत्तरं निश्चित, ठळकपणे देता येणं शक्य नसलं तरी या विषयावर छान 'विचारमंथन' मांडलं जाऊ शकतं. यावर आपण विस्तारानं नंतर चर्चा करूच. पण आज मात्र काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सगळ्य़ाच माणसांना, स्त्री-पुरुषांना, तरुण-तरुणींना, मुला-मुलींना सांगायच्या आहेत. मानव जातीच्या धारणेसाठी, मानवतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते आपण पायदळी तुडवता कामा नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

एक - मानवी जीवनात प्रेम ही एक नितांत सुंदर भावना आहे. खूप हवीहवीशी वाटणारी, सार्‍या जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटणारी भावना आहे. सारं जीवन व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. पण स्वत:चं आणि दुसर्‍याचं 'मानवी जीवन' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असूच शकत नाही. 'सो नो टू डेथ.' मृत्यूला नकार द्या. स्वत:च्या, दुसर्‍याच्या आणि दोघांच्याही. आत्महत्या, खून दोन्हीही नाही.

कितीही प्रेमात पडला, आकंठ बुडाला आणि पुढे, प्रेमभंग झाला तरी.. या प्रेमभंगातून बाहेर पडता येतं. पुन्हा सरसरून जगता येतं. प्रेमाबाहेरही जीवनात खूप काही करण्यासारखं असतं. जीवनातील अनेक क्षेत्रे आपल्या 'डिव्होशनची' वाट पाहत असतात. प्रेमाची ही ऊर्जा त्या कामात टाका. ते काम

फुलून येईल. सरसरून, तरारून उठेल. त्याचा वटवृक्ष निर्माण होईल.

देवदास हा मानवी जीवनातील आदर्श असूच शकत नाही. तो स्वत:ही कधी आनंदानं जगला नाही. त्यानं त्याच्या आई-वडिलांनाही आनंद दिला नाही आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या पारो, चंद्रमुखींनाही कधी आनंदानं जगू दिलं नाही. देवदास हा केवळ पराभूतांचा, षंढांचा, कर्तृत्वहीनांचाच आदर्श असू शकतो. त्याचं दाढी वाढवणं, त्याचं दारू ढोसणं, हाय चंद्रमुखी, हाय पारो म्हणत म्हणत, टाचा घासत घासत उसासे सोडणं सारंच त्याज्य आहे, नाकारणीय आहे.

दोन - एकदा प्रेमात पडल्यावर, दोघांनीही प्रेमात पडल्याची कबुली दिल्यावर ते आयुष्यभर निभावलंच पाहिजे असा एक अलिखित नियमच प्रेम विश्वास निर्माण झाला आहे. हा नियम उत्तम असू शकतो, उत्तम आहे. पण.. नाहीतर धोका, बेवफाई हे लेबलही योग्य नाही. सुरुवातीस दोन पात्र एक-दुसर्‍यांना भेटतात तेव्हा सारंच नवं असतं. वरवरचं असतं. कदाचित एक-दुसर्‍यांची खरी ओळख पटण्याआधीच दोन वरवरचे मुखवटे एक-दुसर्‍याच्या प्रेमात पडतात. जसजसे जवळ येतात, काळ पुढे सरकतो, तसतसे मुखवटे गळून पडतात. आतला खरा माणूस बाहेर येतो. भारतीय समाजात या मुखवटय़ांचं प्रमाण खूपच जास्त आहे. कदाचित मुखवटय़ाआड दडलेला 'खरा माणूस एकदम वेगळाच आहे' असं नंतर लक्षात आल्यावर ते प्रेम सुरू राहणं शक्यच नसतं. अशावेळी एखाद्यानं माघार घ्यायचं ठरवलं तर तसं करण्याचा त्याला तिला अधिकार आहे हे आपण समजून घ्यायला हवं. असं समजून घेणं सोपं नाही. 'दिल टूटता है, टुकडे टुकडे होते है, हृदय छिन्न-भिन्न होतं.' हे सगळं मला कळतं. तरी ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो त्याच्या माघारी फिरण्याच्या निर्णयाचा आपण मनापासून सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. त्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. कोणत्याही प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल न करता त्या व्यक्तीला जाऊ द्यायला हवं. व्यभिचारी, बेवफा म्हणणं, तोंडावर अँसिड फेकणं, तिची येनकेन प्रकारे बदनामी करणं, तिचं जीवन असह्य होईल असं आपण वागणं हा आपण करत असलेल्या प्रेमाचाच अपमान आहे हे समजून घेतलं पाहिजे.

त्यानंतरही सामान्य मैत्री ठेवायची की नाही हा मात्र तुमचा अधिकार आहे. एकदा तुमच्या प्रेम पात्रानं नाही म्हटल्यावर सामान्य मैत्रीसुद्धा न ठेवता, कायमचे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात, तुम्हाला स्वत:ला वाचविण्याचा, मनाला कमीत कमी जखमा होतील याप्रमाणं वागण्याचा पुरेपूर अधिकार आहे. एकतर्फी प्रेमही तेवढंच खरं असतं. पण.. पुढे पाहू.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

परीक्षेच्या काळात माईंड रिलॅक्स ठेवा, टेन्शन अजिबात घेऊ नका

फेब्रुवारी उजाडला. अनेकांच्या परीक्षा जवळ आल्यात. अभ्यास जोमात, जोशात सुरू झाला असेल. 'परीक्षेत उत्तम यश मिळायला हवं. आजच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर उत्तम मार्क्‍स मिळालेच पाहिजेत. प्रयत्न तर सुरूच आहेत, पण उत्तम मार्क्‍स मिळाले नाही तर कसं होईल? आई-वडिलांना काय वाटेल? मित्र-मैत्रिणी काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये हशा होईल! कुणाला तोंड दाखविण्याचीसुद्धा लाज वाटेल? खरंच असं झालं तर? नको नको, असं व्हायला नको, असे विचार मनात घोंगावत असतील.पण कितीही नको नको म्हटलं तरी मनात असा विचार वारंवार येतो. मनाचं टेन्शन वाढत जातं. जसंजसं टेन्शन वाढत जातं तसंतसं मन अस्वस्थ होतं. छातीत धडधड होते. ब्लडप्रेशर वाढू लागतं. आणखी असे नकारात्मक विचार येतात. मन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतं. मनाची एकाग्रता ढळते. अभ्यासात लक्ष लागत नाही. परीक्षेची भीती वाटू लागते. खूप टेन्शन येतं. झोप उडू लागते.अनेकांबाबत या काळात असं घडतं. किमान परीक्षेचं टेन्शन आल्यामुळं अस्वस्थ व्हायला होतं. अभ्यासात मन एकाग्र करणं कठीण जातं. टेन्शन हा स्मरणशक्तीचा शत्रू आहे. त्यामुळं कितीही वेळा अभ्यास केला तरी तो नीट लक्षात राहत नाही. मग आणखीच टेन्शन वाढत जातं. काय करावं तेच कळत नाही.

अनेक विद्यार्थी अशा नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात अडकतात. पण हे स्वाभाविकपणे घडत असलं तरी अपरिहार्य नाही. आपण मनात जसा विचार करत जातो तसं आपल्याबाबत घडत जातं. आपण स्वत:च स्वत:शी सतत बोलत असतो. जसं आपण सतत स्वत:शी बोलू, सतत स्वत:ला सांगू तसंच आपल्याबाबत घडत जाणार आहे. त्यामुळं आपण स्वत:ला काय सांगतो ते फार महत्त्वाचं आहे.अशा वेळी स्वत:च स्वत:शी सेल्फ टॉक करावा. जाणीवपूर्वक स्वत:ला विधायक पद्धतीनं पटवावं. स्वत:चं नाव घेऊन म्हणावं, 'श्यामराव जमेल, अभ्यास जमेल. असा कंटाळा येऊन कसं चालेल? मन भरकटवून कसं चालेल? अभ्यासावर मन एकाग्र करा. बरोबर मन एकाग्र होईल. माझं मन एकाग्र होत आहे. जसा जसा मी अभ्यास करतो आहे तसंतसं ते अधिकाधिक एकाग्र होत आहे. अभ्यासातील गोडी वाढते आहे. अभ्यास करताना मला मनापासून आनंद होतो आहे. अधिकाधिक मन एकाग्र होत आहे. मला छान अभ्यास जमतो आहे.' असं वारंवार स्वत:ला नीट समजावून सांगावं. बरोबर अभ्यास अधिक चांगला जमू लागेल. संमोहनासारखी प्रक्रिया वापरून जर या पद्धतीच्या सूचना दिल्यात तर त्याचा खूप चांगला व प्रभावी परिणाम मिळतो. लवकर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते. पण संमोहन नीट शिकून घ्यावं. वैज्ञानिक पद्धतीनं शिकविणार्‍यांकडूनच शिकावं. आज बाजारात भरमसाट दावे करणारे अनेक संमोहनतज्ज्ञ आहेत. खोटे-नाटे दावे करून भलत्याच गोष्टी ते आपल्या माथी मारत असतात. त्यांच्यापासून आपण सावध राहावं. असल्या भोंदूंना ओळखण्याच्या काही खुणा आहेत. त्यापैकी एक 'माझ्या मित्राचं वा पाल्याचं अभ्यासात मन लागत नाही. परीक्षेची भीती वाटते. मला त्याच्यासाठी संमोहन शिकायचं आहे. मी शिकून त्याचा फायदा देता येईल का?' जो संमोहनतज्ज्ञ हो म्हणेल तो 100 टक्के भोंदू आहे हे तुमच्या लक्षात येईल. संमोहन, मेडिटेशन या सार्‍या प्रक्रिया स्वत:च स्वत:करता वापरता येतात. आपण वापरून इतरांना त्याचा काहीही फायदा देता येत नाही. परीक्षेचं फारच टेन्शन आलं तर स्वत:ला नीट समजावून सांगावं, 'जे होईल ते पाहिलं जाईल. मी आता माझं सारं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतो आहे. नीट मन लावून, एकाग्रतेनं अभ्यास करणार आहे. मला जमेल तेवढय़ा उत्तमपणे मी पेपर सोडवेन. पुढचं पुढं पाहिलं जाईल. मी माझं कर्तव्य नीट पार पाडेन. अगदी रिलॅक्स राहून अभ्यास करेन. परीक्षा देईन. यश-अपयशाची आत्ताच चिंता न करता सारं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करेन. उत्तम अभ्यास करेन' असं जर आपण वारंवार स्वत:ला सांगू लागलो तर अगदी तसाच परिणाम आपल्याला मिळू लागतो. कारण ज्यावेळी आपण टेन्शनमध्ये असतो, भीतीच्या आहारी असतो त्या वेळी आपण 'हायली सजेस्टिबल' असतो. या अवस्थेत जर आपण अशा विधायक सूचना दिल्यात तर त्या प्रभावीपणे अमलात येऊ शकतात, नव्हे येतात.

फक्त या सूचना देताना काही क्षण डोळे मिटा. पूर्ण एकाग्रतेनं स्वत:ला अशा विधायक सूचना द्या. डोळे उघडा आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हापुन्हा असा प्रयत्न करत गेलात तर बरोबर तुम्हाला रिझल्ट मिळताहेत अशी प्रचिती येईल. स्वत:च स्वत:च्या अभ्यासाचा टाईमटेबल तयार करा. तो काटेकोरपणे पाळा. 'पण सर, मी अशा अवस्थेत परीक्षा दिली, मला कमी मार्क्‍स मिळाले, तर माझं अख्खं करिअर बरबाद होईल ना? त्यामुळं ड्रॉप घेणं उत्तम नाही का?' असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरं म्हणजे परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन टाळण्यासाठी, परीक्षेपासून पळ काढण्यासाठी 'ही ड्रॉपची आयडिया' आपल्याच मनानं काढलेली असते. त्याला आपण कधीही बळी पडता कामा नये. नाही तर आयुष्यभर आपल्याला पळावं लागेल. एखाद्या समस्येला सरळ न भिडता पळून जाण्याची सवय लागेल. आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी हे फार घातक आहे. त्यामुळे मनापासून ठरवून टाकायचं, 'मी पळून जाणार नाही. कितीही टेन्शन आलं, भीती वाटली तरी मी पळणार नाही. अभ्यास करेनच. परीक्षा देईनच. वाट्टेल ते झालं तरी मी हे करेनच' असं वारंवार स्वत:ला सांगायचं. पण परीक्षेत कमी मार्क्‍स मिळून करिअर बरबाद झालं तर? या प्रश्नाचंही सोपं उत्तर आपल्या मनाला देता येतं. ठीक आहे. तरी मी अभ्यास करेन. सार्‍या पेपर्सचा मन लावून अभ्यास करेन. सारे पेपर्स देईन. फक्त शेवटच्या पेपरच्या दिवशी मी ठरवेन, तो पेपर द्यायचा की नाही ते. मला मार्क्‍स कमी मिळून करिअर बरबाद होईल असं निश्चित वाटलं तर मी शेवटचा पेपर देणार नाही. त्यामुळं मला सारी परीक्षा पुन्हा दुसर्‍यांदा देण्याची संधीही मिळेल आणि आता अभ्यास, परीक्षा यापासून पळून जाण्याच्या मानसिकतेपासूनही मला स्वत:ला वाचवता येईल.' असं स्वत:ला नीट समजावून सांगून त्याप्रमाणं प्रत्यक्षात आपल्याला वागता येतं. टेन्शनही कमी होतं.

टेन्शन कमी करण्याचे काही सुंदर उपाय आहेत. आजच्या आधुनिक काळाची ती देण आहे. माझ्या 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमध्ये मी दोन प्रकारचं प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांना शिकवतो. संमोहनात जाऊन अभ्यासाची गोडी-एकाग्रता वाढविण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याप्रमाणे नियमित सराव करायला लागलात तर अभ्यासाची एकाग्रता-गोडी वाढू लागते आणि एकाग्रतेनं अभ्यास करू लागल्यामुळं अभ्यासाचा 'इनपूट' वाढतो.

दुसरं परीक्षेची भीती आणि परीक्षेचं टेन्शन येऊ न देता रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याचा नियमित सराव करायला लागलं की, रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देणं जमू लागतं. परीक्षेच्या काळात आपलं माईंड जेवढं रिलॅक्स असेल तेवढी आपली स्मरणशक्ती उत्तम पद्धतीनं काम करते. आपला परीक्षेचा 'आऊटपूट' वाढतो. केवळ या दोन प्रोग्रामिंगमुळंसुद्धा आपणंच करत असलेल्या अभ्यासाच्या भरवशावर आपला परीक्षेतील परफार्मन्स सुधारतो. परीक्षेतील परसेन्टेज वाढतं. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घेतला आहे.जरी आपण कार्यशाळा केली नाही तरी घरी बसल्या तुम्ही करू शकाल अशी एक सोपी रिलॅक्सेशन पद्धती सांगतो. अर्थात त्याला संमोहनाची सर नाही. तरी काही अंशी निश्चितपणे आपणास परिणाम मिळू शकतील.रिलॅक्स करणं म्हणजे आपल्या मसल्स ढिल्या सोडणं, ताणरहित अवस्थेत आणणं. आरामात खुर्चीवर बसा अथवा बेडवर झोपा. (उशी पातळ हवी.) सारं शरीर ढिलं सोडा. डोळे बंद करा. टप्प्याटप्प्यानं सारं शरीर रिलॅक्स करा. मनातल्या मनात म्हणा आणि तसं करा. पायांची बोटं रिलॅक्स, तळवे रिलॅक्स, पाय रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, मांडय़ा रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, श्वासोच्छ्वास नॉर्मल, संथ, लयबद्ध होतोय. पाठ-पाठीचे रिलॅक्स, खांदे-दोन्ही हात-बोटं रिलॅक्स, मान रिलॅक्स, जबडा रिलॅक्स, गाल-कान रिलॅक्स, ओठ-नाक रिलॅक्स, डोळे-पापण्या रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, आठय़ा निघून जाताहेत. डोकं रिलॅक्स, डोक्यातला प्रत्येक मज्जातंतू रिलॅक्स होतोय. डावं डोकं रिलॅक्स, उजवं डोकं रिलॅक्स, डोकं खूप रिलॅक्स, रिलॅक्स हलकं हलकं झालंय. खूप शांत, आनंदित, टवटवीत वाटतंय असं 2 वेळा म्हणा. 2-4 सेकंद थांबा व पुढील सूचना द्या.

मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो आहे. दिवसेंदिवस माझी अभ्यासातील गोडी, एकाग्रता वाढते आहे.मी सोडत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या मनातील टेन्शन, नकारात्मक विचार, परीक्षेची भीती निघून जाते आहे आणि मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची निर्भयता, रिलॅक्सेशन व विधायक विचार करण्याची क्षमता वाढते आहे.(हे सजेशन 2 ते 3 वेळा रिपीट करा.) मला खूप आनंदित, टवटवीत, रिलॅक्स, उत्साहित वाटतंय असं तीनदा म्हणत म्हणत हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा. 5 ते 6 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. बस्स एवढंच. दरवेळी अभ्यासाला बसताना असा सराव करा. दिवसांतून किमान 3 ते 5 वेळा असा सराव करा आणि पाहा काय परिणाम मिळतात ते.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832